*पर्यावरणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता*
*आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*
*’इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ २०२५ चा समारोप*
*चंद्रपूर – भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पर्वत उचलण्याची एकट्याची क्षमता होती. पण असे असतानाही त्यांनी सर्वांना सोबत घेऊन गोवर्धन पर्वत उचलला. अगदी त्याचप्रमाणे या पर्यावरणाचा गोवर्धन उचलायचा असेल तर आपल्याला सर्वांना सोबत येण्याची आवश्यकता आहे. सामूहिक प्रयत्नांमधूनच पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*
एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-२०२५’चा समारोप झाला. यावेळी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. उज्ज्वलाताई चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वन अकादमीचे संचालक रेड्डी, मनपा उपायुक्त मंगेश खवले, भाजपा महामंत्री डॉ मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पपूर्तीसाठी नेहमी तत्पर असल्याबाबत आश्वस्त केले. संवाद, चर्चा आणि मंथनातूनच आपण प्रश्न सोडवू शकतो, यावर आपला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. आज जग चिंतेत आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम दिसू लागले आहेत. ‘क्लायमेट चेंज’मुळे लाखो लोकांना आपले जीवन गमवावे लागत असल्याच्या बातम्या जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये येतात, तेव्हा त्याबाबतची जबाबदारी अधिक तीव्रतेने जाणवते, असे त्यांनी सांगितले.
१८२० मध्ये औद्योगिक क्रांती आली तेव्हा आपल्याला वाटले की मानवी जीवन आनंदी होईल. पण तसे न होता त्याचे पर्यावरणावर दुष्परिणामच दिसू लागले. उन्हाळ्यात नेहमीच चंद्रपूरचे तापमान जगात सर्वाधिक असते. तसे वृत्तही नेहमी प्रकाशित होतात. आता आम्हाला पर्यावरण बदलातून होणारे परिणाम थांबवून चंद्रपुरातील तापमान कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा देखील संकल्प करायचा आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रावर, मंगळावर पाणी शोधण्यासाठी आपण कोट्यवधी डॉलर्स, पाऊंड खर्च करतो आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील पाण्याचे जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता आहे असे आ. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.