प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत
आज सनदांचे ऑनलाईन वाटप
अमरावती, दि. 17 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. 24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावांतील आबादी क्षेत्रातील घरांसाठी मालमत्ता पत्रक देणे हा आहे. ही योजना ग्रामीण विकास विभाग, भूमि अभिलेख कार्यालय (महसूल विभाग) आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असून यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्रांचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविते.
उदया, शनिवार दि. 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्ड, सनदचे ई-वितरण करतील, तसेच या योजनेतील काही लाभार्थ्यांशी संवाद साधतील. यानंतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमामार्फत मालमत्ता कार्ड, सनदचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे.
स्वामित्व योजनेचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती विभागातील जिल्ह्यामधील तालुका आणि पंचायत स्तरावर एकुण 149या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी स्वामित्व योजनेबाबत माहितीचे सादरीकरण भूमि अभिलेख विभागामार्फत करण्यात येणार असून त्यामुळे जनतेला योजनेच्या लाभाची माहिती मिळणार आहे. सदर कार्यक्रमास भूमी अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी ग्रामीण जनतेस स्वामित्व योजनेतून तयार होणा-या मिळकत पत्रिकेवर मिळणाऱ्या कर्जा च्या योजनांसंबंधी माहिती जनतेस देता येईल.
अमरावती जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यातील 34 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा स्तरावरील कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रतापदादा अडसड, रवी राणा, सुलभाताई खोडके, उमेश यावलकर, प्रवीण तायडे, केवळराम काळे, गजानन लवटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांच्या उपस्थितीत मौजे रामगाव तालुका अमरावती या गावाच्या सनद वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यातील 50 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून तालुकास्तरावरील कार्यक्रम मोताळा तालुक्यामध्ये होणार असून आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
अकोला जिल्ह्यातील एकुण 7 तालुक्यातील 12 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हास्तरावरील कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे होणार असून कार्यक्रम स्थळी मौजे कळंबेश्वर येथील सनद वाटप कार्यक्रम होणार आहे. तसेच तालुका स्तरावरील कार्यक्रम मौजे भोकर तालुका तेल्हारा येथे आयोजित करण्यात आला असून आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांना सनद वाटप करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 44 गावांमध्ये सनद वाटपाचा कार्यक्रम होणार असून आदिवासी विकासमंत्री अशोक ऊईके यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यातील एकुण 9 गावांमध्ये कार्यक्रम होणार असून त्यास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित राहणार आहेृ
भुमि अभिलेख विभाग व गामविकास विभाग यांचे संयुक्त विद्यामानाने होणा-या सनद वाटप कार्यक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भूमि अभिलेख विभागाने केले आहे.
00000